वर्षा जल संचयन ही व्यापक चळवळ बनावी, जास्तीतजास्त लोकांनी जागरूक होऊन त्याची अंमलबजावणी करावी यासाठी जुन्या इमारतींबरोबरच नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना वर्षा जल संचयनाबाबत नवीन धोरण तयार करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी चर्चा करून शहर विकास विभागाला त्याचा मसुदा तयार करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. सध्या पाणी प्रश्नाचं गांभीर्य वाढलं असून दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी जलसंचयनाच्या माध्यमातून अडवल्यास जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. जास्तीतजास्त प्रमाणात जुन्या इमारतींमध्ये ही योजना कशी राबवता येईल, त्यासाठी काय अतिरिक्त सुविधा देता येतील, त्याचबरोबर नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना काय सुविधा देता येतील याबाबत धोरण बनवलं जाणार आहे.