जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गाजांची लागवड रोखण्यासाठी वन विभागाने लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. यासंदर्भात संशयास्पद आढळल्यास संबंधित विभागांशी समन्वय साधून कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दिपाली धाटे यांनी दिले. तसेच अंमली पदार्थ सेवन रोखण्यासंदर्भात सर्व विभागांनी जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज धाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क रहावे. ग्रामीण भागातील रासायनिक कंपन्या, बंद पडलेल्या कंपन्या, गोदामे आदी ठिकाणांची संयुक्त तपासणीसाठी गट स्थापन केला आहे. या गटाने नियमित तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच आरोग्य, शिक्षण विभागाने अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना दिपाली धाटे यांनी यावेळी दिल्या.