नाट्य प्रशिक्षण शिबिरात जे काही शिकायला मिळतं त्याचा उपयोग फक्त नाटक करतानाच होतो असं नसून त्यामुळे सभा धीटपणा येतो आणि व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो, असे प्रोत्साहनपर उद्गार ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी काढले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील गरीब होतकरू मुलांच्या कालगुणांना वाव मिळण्यासाठी श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला वंचितांचा रंगमंच हा उपक्रम गेली ८ वर्षे चालवला जातो. त्या अंतर्गत यामध्ये सहभागी होणार्याा कलाकारांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेश म्हस्के बोलत होते. ग म भ न, बरोमास अशा नावाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शक संतोष वेरूळकर हे ही उपस्थित होते. ते म्हणाले, अशा प्रकारचे नाट्य प्रशिक्षण आणि ते ही सुप्रिया ताईंसारख्या प्रतिभावान नाट्यकर्मी कडून मिळतंय , हे या मुलांचे भाग्य आहे. मी स्वता; किशोर वयापासून रत्नाकर मतकरी आणि सुप्रियाताई यांच्या बरोबर काम करताच शिकलो आहे. यावेळी समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया मुलांना मार्गदर्शन करत म्हणाले की, या शिबिरातून तुम्ही नाटकाची विविध अंगे शिकाल पण त्याही पेक्षा एक उत्तम सामाजिक जाण असलेली व्यक्ती म्हणून बाहेर पडाल याची मला खात्री आहे. या प्रसंगी संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता पंकज गुरव आणि संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी मिळून बनवलेल्या संस्थेच्या samatavichar.org या वेबसाइटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रसिद्ध कलाकार सुप्रिया मतकरी विनोद, नाट्यजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि त्यांचे सहकारी दीप्ती दांडेकर आणि आदित्य कदम यांनी प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी अतिशय आपुलकीने हाताळली. ठाण्यातील विविध वस्तीतून आलेल्या शंभराहून अधिक मुलांना समजून घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी नाट्यविषयक विविध खेळांचे आयोजन केले. मुलांनी स्वत: विचार करून ते नाट्य रूपाने कसे व्यक्त करायचे, नवरसांसहित अनेक भावना अभिनयातून कशा व्यक्त करायच्या हे त्यांनी मुलांना वेगवेगळ्या खेळांतून शिकवले. डिसेंबर मध्ये होणार्या नाट्यजल्लोषमधे आता ही मुले दमदारपणे सादरीकरण करतील अशी खात्री संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी व्यक्त केली.