लॉकडाऊनचे कारण देऊन मराठी माणसांना नोकरीवरून काढून टाकणाऱ्या उद्योजकांविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्याची आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कामगारांना माणुसकीच्या दृष्टीने सांभाळून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. परंतु काही व्यापारी या कठीण काळात कर्मचा-यांना वाऱ्यावर सोडून तडकाफडकी कामावरून काढून टाकत असून अशा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. ओबेरॉय बिल्डरच्या बाबतीतही अशा अनेक तक्रारी येत असून असे अनेक बिल्डर कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावर येऊ नका असे सांगत आहेत. यामुळे मानसिक धक्का बसून अनेकजण बेजार झाल्याचे सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे निश्चितच उद्योगासह सर्वच क्षेत्राला जबरदस्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक दडपण आहेत. हि बाब जरी सत्य असली तरी कामगारांना कामावरून अश्याप्रकारे काढून टाकणे हा त्यावरचा उपाय असु शकत नाही. आयुष्याची २०- २५ वर्ष एखाद्या कंपनीसाठी निष्ठेने काम करणारा कामगार नक्कीच अश्या कठीण परिस्थितीत आपल्या कंपनीला होणारं आर्थिक नुकसान जाणतो. त्यावर काही मार्ग काढण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणे महत्वाचे असल्याकडे प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे. तरीही यापुढे मराठी माणसांना नोकरी वरून काढण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलाच, तर अशा व्यापाऱ्यांची तक्रार करण्यासाठी अन्यायग्रस्तांना शासनाच्या वतीने एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध व्हावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.