ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये रेझिंग डे साजरा केला जात असून यानिमित्तानं विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू नागरिकांना परत देण्यात आल्या. यावेळी ४९ गुन्ह्यांमधील तब्बल ५१ तक्रारदारांचा ४९ लाख रूपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये एटीएम मधील रोकडसह दागदागिनेही परत करण्यात आले. एखाद्या चोरीची तक्रार झाल्यानंतर गुन्हेगाराचा माग काढत त्याच्याकडून चोरीचं सामान जप्त करण्यास पोलीसांना बराच कालावधी लागतो. या काळात संबंधित तक्रारदाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक बदलत असल्यानं तक्रारदारांचा शोध घेणं कठीण होतं. त्यातच न्यायालयीन प्रक्रियेशिवाय मुद्देमाल परत देता येत नाही. यावर मात करण्यासाठी पोलीसांनी रेझिंग डेच्या निमित्तानं तक्रारदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांचा मुद्देमाल परत केला. यामध्ये ५० तोळे सोनं, १८ दुचाकी, १ चारचाकी, १ सायकल, ८ मोबाईल, ७५ हजार रूपयांची रोकड असा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. वागळे इस्टेटमध्ये ५२ गुन्ह्यांमध्ये ५६ लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये २२ लाखांचे सोने, ९ चारचाकी, ४ रिक्षा, १७ दुचाकी, १०७ मोबाईल अशा ऐवजाचा समावेश होता.