रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या विरोधात कार्यकारिणीनेच बंड पुकारलं आहे. कार्यकारिणीच्या सदस्यांनी रामदास आठवले यांच्याकडे एका पत्राद्वारे तायडे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीमधील २६ सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत बंडाचे हे निशाण फडकवण्यात आले. या २६ जणांमध्ये शहर महासचिव ते प्रभाग अध्यक्षांपर्यंतच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात रामभाऊ तायडे यांनी काम केलं होतं. परस्पर व्यवहार करून कार्यकर्त्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न तायडे यांच्याकडून केला जातो असे काही तायडे यांच्यावर आरोप आहेत. युवकांच्या साथीनंच तायडे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत मात्र कार्यकर्त्यांना दमदाटी करणं, हुकुमशाही पध्दतीनं वागणं असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. यामुळेच पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षांवर अविश्वास टाकून तायडे यांचीच हकालपट्टी करत असल्याचं कार्यकारिणीने जाहीर केलं आहे. येत्या ४-५ दिवसात पक्षानं तायडे यांच्यावर कारवाई न केल्यास शहरातील सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशाराही पदाधिका-यांनी दिला आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहर प्रवक्त्यांसह इतर ७ पदाधिका-यांची पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांनी हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया, खंडणी तसंच महिलांवर अन्याय, अत्याचार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.