भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे हे २९ वे वर्ष आहे. या वर्षीची बाल विज्ञान परिषद गुजराथमध्ये फेब्रुवारीमध्ये संपन्न होणार आहे. या वर्षीचा मुख्य विषय ”शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविण्यपूर्णता” हा आहे. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे हि संस्था संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची समन्वयक संस्था म्हणून गेली एकवीस वर्षे कार्यरत आहे. मुलांच्या बाल वयात विज्ञानाची आवड जोपासली जावी, आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा हे बाल विज्ञान परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वैज्ञानिक पद्धतीने बाल वैज्ञानिकांनी केलेले संशोधनात्मक प्रकल्प हे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे खास वैशिष्ट्य. या संशोधनातून भावी संशोधक निर्माण होत आहेत. राज्य पूर्व निवड चाचणीसाठी महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्हामधून निवड झालेल्या २68 प्रकल्पातून 103 प्रकल्पांची राज्यस्तरीय परिषदेसाठी निवड झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १४, मुंबई उपनगर ११, पुणे १०, नाशिक ७, रायगड ६, अहमदनगर ५, धुळे, नंदुरबार, पालघर प्रत्येकी ४, अकोला, अमरावती, कोल्हापूर प्रत्येकी ३, मुंबई शहर , नागपूर, उस्मानाबाद , सातारा , सिंधुदुर्ग प्रत्येकी २, औरंगाबाद , बीड, बुलढाणा , चंद्रपूर , गोंदिया , जालना, लातूर , नांदेड, रत्नागिरी, सांगली, वर्धा, यवतमाळ, आदिवासी, सोलापूर, जळगाव, भांडरा, वाशीम,गडचरोली आणि परभणी प्रत्येकी एक अशी निवड झाली आहे. राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषद ऑनलाईन पद्धतीने जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.