रामनगर येथे वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या अधिकार्यांना रिपब्लिकन पक्षा च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यास आलेले अधिकारी रिकाम्या हाताने परतले. काल सायंकाळी सीपी तलाव, रामनगर येथे महावितरणचे काही अधिकारी आणि कर्मचारी दोन ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले होते. याची माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते अशोक कांबळे यांनी या ठिकाणी धाव घेऊन कोरोना काळात लोकांना पोट भरण्याची भ्रांत आहे. अशा काळात पाठविण्यात आलेले हे वीज बिल ग्राहक कसे काय अदा करतील? असा प्रश्न करीत वीज मीटर कापण्यास विरोध केला. यावेळी झालेल्या बैठकीत महावितरणने जर मीटर कापले तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल; महावितरणने गुन्हा दाखल केला तरी आमचा विरोध कायम असेल, असा इशारा दिला. त्यामुळे महावितरणचे अधिकारी कोणतीही कारवाई न करता परतले.