श्रमिकांनी अवैध आणि धोकादायक प्रवासाऐवजी राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे हजारो मजुरांना सुरक्षितपणे बसेसद्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात येत आहे . विशेषतः एसटी बसेस योग्य रीतीने सॅनिटाईज केलेल्या असुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे श्रमिक- मजुरांनी अवैधरित्या आणि धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन महामंडळानं केलं आहे. गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध आणि धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ शकते. तसेच एसटी महामंडळ आणि राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहिम अधिक तीव्र केली असून गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेवून त्यांना तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आज तब्बल १२०० बसद्वारे २७ हजार ५२८ मजुरांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. गेल्या ५ दिवसांत राज्यातील ७२ हजार ९५६ श्रमिक-मजुरांना या सुरक्षित प्रवासी वाहतूकीचा लाभ झाला असल्याचं परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आलं.