शहरात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली असून भर पावसात महापालिका आयुक्तांनी तलाव सुशोभीकरण, साफसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज सायंकाळी महापालिका आयुक्तांनी मासुंदा तलाव येथून मुसळधार पावसात चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये मासुंदा तलाव, जांभळी नाका, भाजी मार्केट तसेच स्टेशन रोडवरील मुख्य मार्केट आदी ठिकाणांच्या रस्ते दुरुस्ती, पाणी साचणारी ठिकाणे तसेच साफसफाई कामाची पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग कमी होत असून पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त रोज विविध ठिकाणांच्या स्वच्छता कामाची पाहणीसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.