एखादी योजना चांगली असली तरी या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास अशा योजनेवर टीका होऊ शकते. ठाणे महापालिकेमध्ये सध्या शहरसौंदर्य करणा अंतर्गत ठीकठिकाणी भिंतीवर बोलके आणि आकर्षक चित्र काढण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना म्हणजे भिंती रंगवताना अनेकदा जागा मालकाच्या परवानग्याही घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी आहे. त्याचप्रमाणे ज्या भिंतीवर आधीच आकर्षक चित्र आहेत अशा भिंतीवर नव्यानं पुन्हा चित्र रेखाटून काय साध्य केलं जात आहे हे मोठे प्रश्नचिन्हच आहे. ठाणे महापालिका हा करदात्यांच्या पैशातून विविध योजनांवर खर्च करत असते, अशा करदात्यांच्या पैशाची अयोग्य उधळपट्टी का अशी चर्चा सध्या सुरू आहे. शहर सौंदर्यकरणाअंतर्गत भिंतीवर चित्र जरूर रेखाटली जावेत पण ज्या भिंती आपल्या मालकीच्या नाहीत आणि ज्या भिंतीवर आधी आकर्षक चित्र आहेत अशा भिंतीवर विनापरवानगी कोणाच्या आदेशाने पुन्हा रंगारंगोटी केली जात आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.