लॉकडाऊनमुळे एकूणच आर्थिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाच्या ६ महिन्याच्या फी मध्ये सवलत द्यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. यामुळे लोकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. ठाण्यात मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय, कष्टकरी आणि नोकरदार वर्ग राहतो. त्यामुळे कामधंदे बंद असल्याने अनेकांची पगारही मिळालेले नाहीत. अशातच काही शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू केल्या आहेत आणि काही शाळांननी पालकांकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या फीची मागणी सुरू केली आहे. त्यासाठी पालकांना फोनही केले जात आहेत. अशा काही पालकांनी फोन करून आपली व्यथा सरनाईक यांना सांगितल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. एका टर्मची फी भरा नाहीतर तुमच्या मुलाला ऑनलाईन शिकवणार नाही किंवा शाळेतून काढून टाकू अशा प्रकारच्या धमक्या काही शिक्षण संस्था देत असतील तर ते योग्य नाही त्यामुळे शिक्षण संस्थांनी पालकांना सवलत देण्याचा निर्णय घ्यावा अशी प्रताप सरनाईक यांची मागणी आहे. पण यावर्षी फी भरली नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थी किंवा पालकाला त्रास होता कामा नये कोणताही विद्यार्थी फी च्या कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असं सरनाईक यांनी शिक्षण संस्था आणि शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.