यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार करण्यात आला आहे. केवळ सवलतींचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प असल्याचं अर्थविश्लेषक दीपक करंजीकर यांनी सांगितलं. दिनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित भगवानराव पटवर्धन स्मृती व्याख्यानात अर्थसंकल्प २०२० या विषयावर करंजीकर बोलत होते. यावेळी डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचं प्रकाशन दीपक करंजीकर यांच्या हस्ते झालं. अर्थ साक्षरतेच्या पुढचे पाऊल या अर्थसंकल्पानं टाकलं आहे. हा अर्थसंकल्प दीर्घकाळाचा विचार मांडतो. २०३० पर्यंतच्या आर्थिक बदलांची पायाभरणी या अर्थसंकल्पात आहे. आपल्या सवयी बदलायला लावणारा हा अर्थसंकल्प आहे. गुंतवणूक केवळ कर वाचवण्यासाठी नव्हे तर भविष्याचा विचार करण्यासाठी असल्याचं सूत्र या अर्थसंकल्पात असून देशाचा गियर या अर्थसंकल्पानं बदलला आहे. हा बदल लक्षात घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली पाहिजे असं दीपक करंजीकर यांनी सांगितलं. वित्तीय शिस्त पाळत जनसामान्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं डॉ. अभिजित फडणीस यांनी सांगितलं.