दिवाळी तोंडावर आली असून सध्या सर्वत्र फराळाची चर्चा सुरू आहे. आपल्याकडच्या गृहिणी या अलिकडे घरात फराळ करण्यापेक्षा बाहेरील फराळावरच जास्त अवलंबून राहू लागल्या आहेत. परदेशात तर फराळासाठी लागणा-या वस्तू आणि वेळ मिळत नसल्यामुळे परदेशातून दिवाळीत फराळाला मोठी मागणी असते. ठाण्यातील मेधा देशपांडे यांच्याकडेही अशीच फराळाला मोठी मागणी असून चकल्यांपासून शेव, करंज्या, अनारसे, चिवडा, भडंग ते अगदी लाडवांपर्यंत मोठी मागणी आहे. यंदा तर पूर्वेकडील देशातूनही देशपांडे यांच्या फराळाला मोठी मागणी आहे. अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, हाँगकाँग, मध्य पूर्वेतील देश, युरोपातील देश अशा जगाच्या विविध भागातून आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी देशपांडे धडपडत आहेत. गेली २१ वर्ष देशपांडे परदेशात फराळ पाठवतात. यंदा मागणी वाढल्यामुळे रोज २२ तास काम करून त्यांनी फराळाची मागणी पूर्ण केली आहे. दस-यानंतर तयार केलेला फराळ परदेशातील पॅकींगचे नियम पाळून परदेशात पाठवायला सुरूवात केली जाते. यंदा परदेशातील कुटुंबांबरोबरच विविध देशातील मंडळांकडूनही त्यांना मोठी मागणी आल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.