मोबाईल चोरण्यासाठी चोरट्यांनी प्रवाश्याचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना ठाणे रेल्वे स्थानकातील सार्वजनिक पादचारी पुलावर घडली.
सुदैवाने या घटनेत प्रवाशाला कुठलीही मोठी इजा झाली नाही.याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सहा.पोलीस निरिक्षक मनिष पठाणे यांच्या पथकाने तात्काळ स्थानकातील सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे पवनकुमार सिंग आणि करण चव्हाण या दोघा चोरटयांना अटक करून मोबाईल हस्तगत केला. नालासोपारा येथे राहणारा आकाश वर्मा हा विद्यार्थी कामानिमित्त मुळगावी गेला होता.कामयानी एक्सप्रेसने तो ठाणे रेल्वे स्थानकात उतरून पादचारी पुलावरुन पायी जात होता.तेव्हा,पवनकुमार या भामटयाने आकाशच्या खांद्यावर थाप मारुन त्याचा गळा आवळला.तर,दुसरा साथीदार करण याने आकाशच्या उजव्या हातातील सुमारे दोन हजारांचा मोबाईल जबरदस्तीने खेचुन दोघांनीही तिथून पळ काढला.आकाशने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पुर्वेकडील टीएमटी बस स्थानक परिसरातुन दोघानाही अटक केली.केवळ मोबाइलसाठी चोरटयांची मजल प्रवाशांचा गळा आवळण्यापर्यत गेल्याने रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे.