मोटरमन विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोटरमनला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. हजारो चाकरमानी महिला लोकलने प्रवास करतात. सध्या कोरोनामुळे महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. पण कोणत्याही आपत्तीत मोटरमन नोकरीवर हजर राहून आपले कर्तव्य चोख बजावतात. त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्याबरोबरच एक भाऊ म्हणून महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करणाऱ्या मोटरमन्सला राखी बांधण्यात आल्या. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीपेक्षा ठाणेकरांना लोकल प्रवास नेहमीच पसंतीचा आहे. त्यात मोटरमन्स हा महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक नोकरदार महिलेसाठी मोटरमन हे बंधुतुल्य आहेत. या भावनेतून रक्षाबंधनाचा उपक्रम पार पडला.