ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मालकी हक्काची घरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दिली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचं मनोबल वाढावं यासाठी शासनाच्या धोरणानुसार विविध योजना राबवण्यात येतात. दिव्यांग व्यक्तीचं योग्य पुनर्वसन व्हावं यासाठी ठाणे महापालिकेतर्फे दिव्यांगांना मालकी हक्काची घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रातिनिधिक स्वरूपात या घरांचे चावी वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंही होतं पण कोविड प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष घराचा ताबा देण्यास विलंब झाला. या सदनिकांमध्ये काही साहित्यही ठेवण्यात आलं होतं. महापौरांनी दिव्यांगांसाठी असलेल्या सदनिकांमधील साहित्य तातडीनं हटवून या सदनिका दिव्यांगांना उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला होता. पालिका आयुक्तांनी त्याची दखल घेऊन या सदनिका दिव्यांगांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे १९० दिव्यांगांना सदनिका देण्यात येणार असून कासारवडवली, तुळशीधाम, पडले गाव, ब्रह्मांड, कोलशेत, रिव्हरवूड, सागर्ली अशा विविध ठिकाणी या सदनिका आहेत. मालकी हक्काच्या सदनिका मिळाल्यामुळं दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना मोठा दिलासा आणि आधार मिळणार आहे. दिव्यांगांना कायमस्वरूपी घरं देणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका असल्याचं महापौरांनी नमूद केलं आहे.