ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं तसंच साहित्याचं काल मध्यरात्री वाटप केलं. कोरोना महामारीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहचवण्याचं काम शिंदे दाम्पत्याद्वारे केलं जात आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण समजला जातो. त्यातच लॉकडाऊननंतर सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली. म्हणून त्यांना हातभार लावण्यासाठी मिनाक्षी शिंदे यांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या बाजारपेठेत म्हणजे जांभळी नाका ते तहसिल कार्यालयापर्यंत अनेक आदिवासी महिला टिटवाळा, वज्रेश्वरी, कसारा, कासारवडवली अशा विविध भागातून रानभाज्या, झेंडूची फुलं, आंब्याच्या डहाळ्या, गवती चहा अशा वस्तू विकण्यासाठी येत असतात. या महिला रात्री १२ वाजल्यापासून बसलेल्या असतात. यासाठी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी रात्री अडीच वाजता दिवाळी फराळ आणि साहित्याचं वाटप केलं.