पालघर जिल्ह्यातील वाडा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. वाडा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्रांगणात हे स्मारक उभारलं जाणार आहे. भारतातील पंतप्रधानांचं हे पहिलं स्मारक ठरेल अशी चिन्हं दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी अटलबिहारी यांचं स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये ७ सदस्य आहेत. या स्मारकामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आणि ऊन, पाऊस, वादळ, वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यावर २० बाय २० ची मेघडंबरी उभारली जाणार असून असं या स्मारकाचं स्वरूप आहे. स्मारकाच्या चौथ-याचं काम सुरू झालं असून पुढील १५ दिवसात ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा मकराणा मार्बल मध्ये घडवण्यात येत आहे. पुतळ्यावर उभारली जाणारी मेघडंबरी लाल दगडांची असून राजस्थानमधील ढोलपूर येथील लाल दगडाचा वापर या मेघडंबरीसाठी केला जात आहे. या स्मारकाचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर १०० दिवसाच्या आत उभारलं जाणारं हे पहिलं स्मारक ठरेल असं दिसत आहे.