महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा कोरोनामध्ये दोन्ही पालक गेलेल्या बालकांशी संवाद

कोरोनामध्ये ज्या बालकांचे दोन्ही पालक गेले आहेत अशांवर शासनाचा हात आहे असा विश्वास या बालकांना देणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं ही आमची जबाबदारी आहे असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. या बालकांशी यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांनी ही बालकं आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं होतं. ही जबाबदारी पार पाडायला आम्ही इथे आलो आहोत. या बालकांसाठी एक कृती समिती नेमण्यात आली असून ही कृती समिती या बालकांना नियमित भेट देईल आणि त्यांच्या समस्या जाणून घेईल असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. ज्यांचे दोन्ही पालक गेले आहेत अशा बालकांच्या नावावर प्रत्येकी ५ लाख रूपये ठेवण्यात आले असून याबरोबरच या बालकांच्या दैनंदिन गरजा सोडवण्यासाठी उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले जाणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. या बालकांच्या अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत. काहींच्या मालमत्ता विषयक, काहींच्या आधारकार्डाविषयक समस्या असून अशा छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्यांच्या पाठी उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार हे मायबाप म्हणून ओळखलं जातं त्याच भूमिकेतून आपण राज्यात या बालकांच्या भेटी घेत असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांनाही शासनाच्या विविध योजनेतून मदत केली जाईल असंही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading