शासनाच्या आदेशानुसार सर्व महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपासून चालू होणार असली तरी ठाण्याबाबत अद्याप काहीच निर्णय न झाल्यामुळं पालक तसंच महाविद्यालयं संभ्रमात आहेत. मुंबई विद्यापीठानं सर्व महाविद्यालयं स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा करून सुरू करावीत अशा सूचना ५ फेब्रुवारीला दिल्या आहेत. विद्यापीठ आयोगानं कोविडच्या अनुषंगानं ५ नोव्हेंबरला प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सातही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि महापालिकांनाही या संदर्भात पत्र पाठवण्यात आली आहेत. महाविद्यालयांच्या परीक्षाही एप्रिल पर्यंत घ्याव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अजून पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी वर्गही घायकुतीला आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश जिल्ह्यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू करण्याबाबत आदेश जारी केले आहेत. महाविद्यालयं सुरू करण्यासाठी महाविद्यालयांची तपासणी, शिक्षकांची कोरोना चाचणी अशा अनेक बाबींकडे लक्ष द्यावं लागणार आहे. उद्या जर ठाण्यातही १५ फेब्रुवारीपासूनचा निर्णय झाला तर या सर्व गोष्टी दोन दिवसात कशा पूर्ण करायच्या हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयं सुरू होण्याबाबतच्या सूचना विद्यार्थ्यांनाही कळवणं आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडून होणं अपेक्षित आहे. मात्र आज दुपारपर्यंत तरी यावर काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळं महाविद्यालयं सुरू करायची की नाही याचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा सध्या व्यक्त होत आहे. महाविद्यालयांबरोबरच शाळांबाबतही कोणताच निर्णय न झाल्यामुळं शाळांबाबतही हीच संभ्रमावस्था पालक आणि शिक्षक वर्गात दिसत आहे.