गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला आहे. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सांगितले की, गिरनार मंदिरात झालेला प्रकार हा निंदनीय असून त्यामुळे दत्तगुरु भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटकांकडून दत्तस्थानाला क्षती पोहचविण्यात आली असून श्री दत्तगुरू महाराज त्यांना सद्बुद्धी देवो तसेच ज्यांनी कोणी हा निंदनीय प्रकार केला आहे त्याच्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. या महाआरतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,अर्बन सेल अध्यक्षा रचना वैद्य, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, कार्यकर्ते ,पदाधिकारी या आरतीमध्ये सहभागी झाले होते.