खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बनविलेल्या 30 हुन अधिक समित्यांना सोपविलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्था, परिवहन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाला आलेले नागरिक तसंच कार्यक्रम संपल्यानंतर जाणारे नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आदींची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले. कार्यक्रम शांततेत आणि नियोजित पद्धतीने पार पडेल याची सर्वांनीच दक्षता घेण्याच्या सूचना शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या.