राज्यातील सर्वात मोठे आधारकार्ड केंद्र ठाण्यात उभारण्यात आले असून या आधारकार्ड केंद्रात अवघ्या १० मिनिटात आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ठाण्याच्या लेकसिटी मॉलमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रात दररोज ३०० पेक्षा अधिक नागरिक या केंद्राचा लाभ घेत आहेत. या ठिकाणी आधारकार्ड काढण्याची पद्धत सोपी आणि सूटसुटीत असून यासाठी इतर आधारकेंद्रा प्रमाणे वेळ खर्ची करावा लागत नसून अवघ्या १० मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहे. या ठिकाणी १६ कॅउंटरच्या माध्यामतून हि प्रक्रिया पार पाडण्यात येते. त्यात सध्याच्या घडीला या केंद्राच्या माध्यमातून २०० ते २५० आधारकार्ड काढण्याच्या आणि दुरुस्तीच्या प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. तर या ठिकाणी प्रतिदिन एक हजार आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे. कापुरबावडी येथे उभारण्यात आलेल्या या आधारकार्ड केंद्राला आमदार संजय केळकर यांनी भेट देवून तेथील प्रक्रिया समजावून घेतली. दर पाच वर्षांनी आपले आधारकार्ड नुतनीकरण करावे लागणार असल्याचे सांगत, जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय केळकर यांनी केले.