महापौर नरेश म्हस्के यांनी आयोजित केलेल्या पहिल्या महापौर जनसंवादास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जागेवरच समस्यांचं निराकरण झाल्यामुळं नागरिकांनाही या जनसंवादाचा फायदा झाला. दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महापौर जनसंवाद उपक्रमाचं आयोजन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. आज पहिला जनसंवाद झाला. या उपक्रमात जवळपास २० हून अधिक निवेदनं सादर केली. बाधितांचे पुनर्वसन, कमी दाबानं होणारा पाणी पुरवठा, भटक्या कुत्र्यांची समस्या, येऊर येथील साफसफाई, वैद्यकीय सेवा, दिव्यांगांचे प्रश्न अशा समस्यांचे तासाभरात निराकरण झाल्यानं या उपक्रमाचा नागरिकांना फायदा झाला. महापौर या जनसंवाद उपक्रमात वरिष्ठ अधिका-यांसह उपस्थित होते. ठाणेकरांनी आपल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या. कर आकारणी बाबतही विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. कराची रक्कम अनावधानाने अनियमित झाली असेल तर त्याबाबत मार्ग काढला जाईल परंतु करच भरणार नाही अशी नागरिकांची भूमिका असेल तर ती योग्य नाही. शेवटी महापालिकेला विकासाची कामं कररूपी उत्पन्नातून करावी लागतात. त्यामुळं ठाणेकरांनी वेळेवर कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं.