प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. पक्क्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली महाआवास ग्रामीण अभियानाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करून गरीब कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार करा असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सर्वासाठी घरे 2022 हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे तसंच गुणवत्ता वाढीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या 100 दिवसांच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्यात येत आहे. जिल्हयात 2016-17 ते 2020-21 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 6 हजार 626 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 5 हजार 695 एवढी घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. 86 % घरकुलांचे काम पुर्ण झाले असून 931 अपुर्ण घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्हयामध्ये ग्रामीण भागात दर्जेदार घरकुलं बांधकाम होण्याकरीता आणि प्रत्येक गरजू लाभार्थ्याला घरकुल मिळवुन देण्यासाठी सर्व यंत्रणेने काम करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं.