मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय पुस्तक आदान-प्रदान महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. ३१ मे ते २ जून या दरम्यान हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात पुस्तकांची प्रकाशनंही होणार आहेत. तीन दिवस चालणा-या या महोत्सवा दरम्यान रोज वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. आदान प्रदान महोत्सवामध्ये जितकी पुस्तकं दिली जातील तितकी पुस्तकं पुन्हा घेता येणार आहेत. मात्र या आदान प्रदान महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतीलच पुस्तकं स्वीकारली जाणार असून शैक्षणिक, धार्मिक आणि मासिकं स्वीकारली जाणार नाहीत असं निलेश गायकवाड यांनी सांगितलं. पुस्तक आदान प्रदान महोत्सवात गर्दी होऊ नये म्हणून पुस्तकं २१ मे पासूनच स्वीकारली जाणार आहेत. मात्र आदान प्रदान हे तीन दिवसच होणार आहे असं विद्याधर वालावलकर यांनी सांगितलं. ग्रंथ महोत्सवाच्या दरम्यान ग्रंथयान शहरात फिरणार असून या ग्रंथयानात ग्रंथ कलश ठेवला जाणार असून यामध्ये ग्रंथांचं सत्पात्री दान करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. ग्रंथयानाच्या दौ-यात पुस्तकं स्वीकारली जाणार असून बदलली जाणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं. ग्रंथ आदान प्रदान महोत्सवासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या बाहेर पुस्तकाची १६ बाय २४ फूटाची एक भव्य प्रतिकृती लावली जाणार आहे.