देशामध्ये रेल्वे सुरू होण्याला १७० वर्ष पूर्ण झाली असून आज देशातील रेल्वेनं १७१व्या वर्षात पदार्पण केलं आहे. रेल्वेचा हा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देशातील पहिल्या वाफेच्या इंजिनाची प्रतिकृती ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी आरपीएफ रेल्वे कर्मचा-यांकडून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ब्रिटीश काळात देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे १६९ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्यावेळी ४०० प्रवाश्यांना घेऊन आलेल्या या रेल्वेला १ तास १५ मिनिटे लागली होती. कालांतराने हळूहळू ठाणे स्थानकाचा विस्तार होत गेला. सद्यस्थितीत ठाणे स्थानकात एकूण ११ फलाट असून मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सध्या ठाणे रेल्वे स्थानक हे देशातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेले रेल्वे स्थानक आहे.