मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ४१६ मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांची कारवाई

नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करून वाहन चालवणा-या ४१६ मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलीसांनी कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यां विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यावेळी ४१६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यासोबत प्रवास करणा-या २०७ सह प्रवाशांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात २५ डिसेंबरपासून मोहीम सुरू केली आहे. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत झालेल्या कारवाईत एकूण ९२६ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. तर, त्यांच्यासोबत प्रवास करणा-या ४५१ जणांनाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीचे आदेश दिले असले तरी नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण घराबाहेर पडण्याची शक्यता होती. मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने अपघातांचे प्रमाणही वाढण्याची भीती होती. या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी ३१ तारखेला आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करण्यात आली. संशयास्पद वाहनचालकांची ब्रेथ अँनालायझर्सच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही तपासणी करताना कोरोना संक्रमण होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. नारपोली शाखेच्या हद्दित सर्वाधिक ६७ वाहनचालक आणि ४० सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल कोणगाव, डोंबिवली, उल्हासनगर या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी मद्यपी वाहनचालक राबोडी, ठाणे नगर आणि कोपरी या विभागात आढळले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading