यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक कारणांनी आगळी वेगळी ठरली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू मानून मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात मतदान होत असल्यामुळं मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांबाहेर मंडप उभारण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी खास वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात तर वर्तुळाकार मार्ग तयार करण्यात आले असून या मार्गावरील बसेस या मतदान केंद्राबाहेर थांबतील अशा पध्दतीनं नियोजन करण्यात आलं होतं. दिव्यांग मतदारांबरोबरच ज्येष्ठ मतदार अथवा काही कारणाने चालणं अशक्य असणा-या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर अपंगांच्या खुर्च्या तसंच डोलीचीही व्यवस्था करण्यात आली होती. काही मतदारांनी या सुविधेचा फायदा घेतला. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठे प्रयत्न केले होते. पण एकंदरीत पाहता मतदारांकडून तितकासा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नसल्याचंच दिसून आलं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान अधिक व्हावं असं उद्दिष्ट असतानाही मतदानाचा टक्का वाढेल की नाही याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे.