भिवंडीतील मानकोली नाका येथे गोदाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. काल हे १५ वर्ष दुमजली गोदाम कोसळून ही दुर्घटना झाली. गोदाम कोसळल्यानंतर कोसळलेल्या स्लॅबखाली सात ते आठ मजूर अडकले होते. याची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे येथून अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. त्याचप्रमाणे ठाणे आपत्कालीन कृती दलानं धाव घेत ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यास प्रयत्न सुरू केले. यामध्ये सुरेश त्रिपाठी यांचा जागीच मृत्यू झाला तर हृतिक पाटील यांचा काल रात्री मृत्यू झाला. सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी हे यामध्ये किरकोळ जखमी झाले असून अक्षय केणी आणि शैलेश तरे यांना इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील सुरेश त्रिपाठी हे या गोदामाचे सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत होते.