भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ४० झाली आहे. दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास ४५ वर्ष जुनी ही तळ अधिक तीन मजल्याची इमारत पडली होती. यामध्ये आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून २५ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. गेले दोन दिवस या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. पावसामुळं यामध्ये काही काळ अडथळा आला असला तरी टीडीआरएफची पथकं ढिगारा उपसण्याचं काम करत आहेत. काल निधा शेख, शबनम शेख, सोएफ शेख, साकीर अन्सारी, हस्नेल शेख, अन्सारी हनीफ, फरीदा खान, आरीफा खान, मोमिना शेख, परवीन कुरेशी, मरियम कुरेशी, फरिदा खान, पलक खान आणि फराहा खान यांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून यामध्ये आणखी काही रहिवासी अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.