अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी साफसफाई आणि पाणी साचणा-या ठिकाणांची पाहणी करून कचरा टाकणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यानं सोडवण्याचे आदेश देतानाच सर्व यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी महापालिका आयुक्तांनी वंदना बस डेपोपासून मुसळधार पावसात चालतच साफसफाई आणि पाणी साचणा-या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती कारागृह अशा ठिकठिकाणी त्यांनी पाहणी केली. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला असून महापालिकेनंही सतर्कतेचा इशारा दिला आहे. झाडं पडणं, पत्रे उडून जाणं, पाणी साचणं, विजेचे खांब कोसळणं अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.