ठाण्यामध्ये गेले तीन दिवस पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गेले दोन दिवस सलग जवळपास पावणे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळत आहे. यामुळं संपूर्ण ठाणे हे जलमय होऊन गेलं आहे. या जोरदार पावसामुळं ठाण्याच्या विविध भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तर नाले, गटारं भरून तुडुंब वाहत असल्यामुळं नाल्याच्या बाजूला राहत असलेल्या रहिवाशांच्या घरातही हे पाणी शिरल्यामुळं रहिवाशांचेही हाल झाले आहेत. ठाणे महापालिका दरवर्षी नालेसफाईवर कोट्यावधी रूपयांचा खर्च करते. या नालेसफाईवरून आंदोलनं होतात. भ्रष्टाचाराचे आरोपही घडतात पण नंतर मात्र दरवर्षी ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू आहे. ठाण्यातील लोकप्रतिनिधींना हा प्रश्न कायमचा निकाली निघावा असं वाटतं की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. कारण गेली अनेक वर्ष पाणी साचण्याचा प्रश्न भेडसावत असून त्यावर कोणतीही उपाययोजना आजपर्यंत होऊ शकलेली नाही. महापालिकेनं कोट्यावधी रूपयांच्या योजना आखल्या पण नागरिकांचे साधे प्रश्न मात्र महापालिका सोडवू शकलेली नाही. समुद्रातच असणा-या जपानसारख्या इवलाश्या देशानं टोकियो मध्ये साठणा-या पाण्यावर तोडगा काढला. पण ठाणे महापालिकेला मात्र असं काही करावंसं वाटत नाही. मध्यंतरी नाल्यांना जाळ्या बसवण्याची सूचना काही मंडळींनी केली होती. पण त्यावर पालिकेनं लक्षही दिलं नाही. खरंतर नाल्यांवर जाळ्या बसवल्यास पालिकेचा खर्चही कमी होऊ शकतो आणि या त्रासातूनही सुटका होऊ शकते. पण याकडे प्रशासनाला लक्ष द्यावंसं वाटत नाही. पाणी साचू नये म्हणून पालिकेची जेवढी जबाबदारी आहे तेवढी सर्वसामान्य ठाणेकराचीही जबाबदारी आहे. अनेकदा नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. राडारोडा, खराब झालेल्या गाद्या, मोठमोठ्या वस्तू टाकलेल्या असतात. जरा पाऊस झाला की नाल्याच्या कडेला जाऊन या वस्तू अडकतात आणि यामुळं नाल्याचा प्रवाहही रोखला जातो आणि मग नाल्याच्या आजूबाजूला राहणा-या लोकांच्या घरात पाणी जातं. ही दोघांची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे.