भगवान श्री महावीर स्वामींच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त जैन महासंघातर्फे शहरात प्रथमच सगळ्या जैन संघांची महायात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाण्यातील १५ ते २० जैन महासंघांचा आणि इतर बऱ्याच जैन संस्थांचा सहभाग होता. टेंभी नाका येथे वृषभ देवजी महाराज आणि ठाण्यातील समस्त जैन संघ यांच्या वतीने महावीर यांची पालखी काढण्यात आली होती. त्या पालखी मिरवणुकीमध्ये महिला दुचाकी वाहनावर स्वार झाल्या होत्या तर त्यांनी विविध सामाजिक संधी देणारे फलक हातामध्ये घेतले होते. या मिरवणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी या मिरवणुकीला झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी जैन बांधवांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर आणि जैन समाज बांधव – पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.