विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या सामानसुमानाची हलवाहलव महापालिकेनं आज सुरू केली आहे. जवळपास दोन आठवड्याहून अधिक काळापूर्वी महापालिकेनं महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतला होता. महापालिकेनं महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या निर्णयाला विद्या प्रसारक मंडळानं विरोध केला होता. शैक्षणिक प्रक्रिया सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारल्यास शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं अखेर हा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयानं महापालिका आणि विद्या प्रसारक मंडळानं आपापसात तडजोड करावी असे निर्देश दिले होते. या तडजोडीसंदर्भात बैठका होऊनही मार्ग निघत नव्हता. अखेर महापालिकेनं २१ जुलैच्या दरम्यान क्वारंटाईन सेंटर करण्याचा निर्णय मागे घेतला. मात्र हा निर्णय मागे घेऊनही जवळपास दोन आठवडयाहून अधिक काळ क्वारंटाईन सेंटरची साधनसामुग्री हलवली नव्हती. ही साधनसामुग्री हलवण्यास आता सुरूवात झाली असून यामुळे ही शैक्षणिक संस्था मोकळा श्वास घेऊ शकणार आहे.