ठाण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बैरामजी जीजीभॉय म्हणजे बीजे हायस्कूलचं काम पुन्हा एकदा रखडलं आहे. या शाळेची स्थापना १८८० मध्ये झाली होती. अनेक नामवंत विद्यार्थी या शाळेतून घडले. या शाळेच्या पुनर्बांधणीचं काम २००२ मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या लढ्यामुळे सुरू झाले. या शाळेच्या बांधकामासाठी शासनानं सव्वा बारा कोटी रूपये जिल्हा परिषदेस दिले होते. पण जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे शाळेचं काम रखडलं आहे. आता शाळेच्या अंतर्गत कामासाठी जिल्हा परिषदेकडे लक्ष नसल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेला शाळा बांधायला इतकी वर्ष का लागली असा प्रश्न बैरामजी जीजीभॉय माजी विद्यार्थी असोसिएशननं उपस्थित केला आहे.