कोपरीमधील सिध्दार्थनगर येथे बीएसयुपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारती कोविड रूग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी देण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. सिध्दार्थनगर येथे बांधलेल्या इमारती कोविड रूग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून वापरास देण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्यामुळं स्थानिक नागरिकांनी महापालिकेत धाव घेऊन पालिका आयुक्तांकडे घराचा ताबा मिळावा अशी मागणी केली. कोपरीतील हे स्थानिक नागरिक गेली १४ वर्ष हक्काच्या घराच्या बाहेर राहत आहेत. त्यांच्या मूळ जागेवर बीएसयुपी अंतर्गत इमारती तयार होऊन १ वर्ष झालं आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या वाटपही करण्यात आलं होतं. पण रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आला नसल्यामुळं रहिवासी साकेत, वसंतविहार येथील तात्पुरत्या निवारा इमारतीमध्ये राहत आहेत. यापैकी बरेचसे रहिवासी हे दारिद्र्य रेषेखालील आहेत. रहिवाशांचे कामधंदे पूर्वीपासून कोपरी परिसरात आहेत. मुलांची शिक्षणही याच परिसरात आहेत. त्यामुळं रहिवाशांना रोज कोपरीत येण्याजाण्यासाठी आर्थिक भुर्दंडही पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या इमारती विलगीकरण कक्ष म्हणून वापरल्या गेल्या तर रहिवाशांना घराचा ताबा मिळण्यापासून आणखी काही काळ वंचित रहावं लागेल. त्यामुळं घराचा ताबा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी या स्थानिक रहिवाशांतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली.