डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यक्रमाची सुरुवात आज आंबेडकरांना अभिवादन करून झाली असून पुढील 10 दिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 6 ते 16 एप्रिल या कालावधीत आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार जिल्ह्यातही पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 7 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. 8 एप्रिल रोजी जिल्ह्यामधील स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल. 9 एप्रिल ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबविण्यात येतील. जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.10 एप्रिल समता दूतांमार्फत ग्रामीण आणि शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल. तसेच भारतीय संविधानाची जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पथनाट्य होणार आहेत. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार -प्रसार करण्यात येईल. 12 एप्रिलला मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यामार्फत ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. 15 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांविषयी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तसेच तृतीयपंथी जनजागृती आणि नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर 16 एप्रिलला ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.