ठाण्यातील प्रभात टॉकीज परिसरातील ३ दुकानांना आज सकाळी आग लागली होती. मात्र सुदैवानं यात कोणतीही जिवितहानी झाली नाही पण दुकानांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. प्रभात टॉकीज परिसरात इलेक्ट्रीक सामानाची आणि मोबाईलची दुकानं मोठ्या प्रमाणावर आहेत. आज सकाळी येथील गीतेश इलेक्ट्रॉनिक आणि एफएमसी मोबाईल या दोन दुकानांना आग लागली. अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन ही आग नियंत्रणात आणली. सकाळच्या सुमारास आग लागल्यामुळे सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही अन्यथा गंभीर प्रसंग ओढवला असता. या ठिकाणी असलेली ऐतिहासिक विहीर बुजवून वहिवाटीचा रस्ता अडवून हे गाळे उभारण्यात आले आहेत. या बेकायदा गाळ्यांवर यापूर्वीही कारवाईही झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हे गाळे उभे राहिले. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.