पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नका – जिल्हाधिकारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तसेच एल निनो परिणाम, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात अद्याप मौसमी पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आताच पेरणीची घाई करू नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची भिती आहे. किमान १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात अद्याप मान्सूनचा पाऊस सुरू झाला नाही. लवकरच मान्सून जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस नसल्याने पेरण्या केल्यास ते बियाणे वाया जायाची भिती आहे. तसेच भात पिक उगविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार ९०९ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी भातपिका खालील क्षेत्र ५५ हजार हेक्टर एवढे आहे. त्याचप्रमाणे नाचणी आणि वरी पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे २,४०६ हेक्टर आणि १,००५ हेक्टर एवढे आहे. या वर्षी जिल्ह्यात पावसाला पाहिजे तशी सुरूवात झाली नाही. जून महिन्याची पावसाची सरासरी ४६१.९० मि.मी. एवढी आहे. मागील दोन ते तीन दिवसात फक्त ३२ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी किमान १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असेही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading