पालघर जिल्ह्यामध्ये प्रांत कार्यालय हलवावं या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास ६ वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं. या विभाजनानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती. ठाणे जिल्हा हा देशातील दुस-या क्रमांकावर असलेला मोठा जिल्हा होता. त्यामुळं जिल्ह्याच्या दुर्गम क्षेत्रात विकास पोहचत नसल्यामुळं जिल्हा विभाजनाची मागणी अनेक वर्ष होत होती. जिल्हा विभाजन करण्यात आल्यानंतरही अनेक कार्यालयं अद्यापही ठाणे जिल्ह्यातच असल्यामुळं विभाजनाचा फारसा फायदा अद्याप पोहचलेला नाही. पालघर जिल्ह्याचं प्रांत कार्यालय ठाण्यात असल्याने काही कामासाठी ठाण्यापर्यंत यावं लागतं. त्यामुळं हे कार्यालय पालघर येथे हलवावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवाजी मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.