गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकसंख्येच्या आधारावर न्याय आणि समानतेच्या आधारावर प्रभाग रचना व्हावी, यासाठी पत्र दिले होते. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन खासदार, आमदार, महापौर आणि काही नगरसेवकांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात कशासाठी गेले होते; ते निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का, याचे स्पष्टीकरण पालकमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गोपनियतेचा भंग झाला आहे का? त्यांना मूळ आराखडा मिळाला होता का? प्रभाग रचनेत हेराफेरी झाली आहे, असे आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. आपण नरेश म्हस्के यांच्या ज्ञानात थोडीशी भर टाकू इच्छितो; लोकसंख्या ठरविण्याचा अधिकार हा ठाणे महापालिकेला नसून तो अधिकार जनगणना आयुक्तांना असतो. त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे लोकसंख्येचे विभाग पाडण्यात येतात. त्याचाच आधार घेऊन प्रभाग रचना करण्यात येत असते. त्यामुळे महापौरांनी केलेले आरोप हे पूर्णत: चुकीचे आणि निखालस खोटे आहेत.
म्हस्के यांनी आरोप केला आहे की जितेंद्र आव्हाड यांनी हस्तेक्षेप केला. आव्हाड यांच्याकडे आधीचा आराखडा होता का, गोपनियतेचा भंग झाला आहे. प्रभाग रचनेची संपूर्ण तयारी ही ठाणे पालिका प्रशासनाची होती. म्हणून महापौर म्हस्के यांनी स्वत: पोलीस आयुक्तांकडे जाऊन तक्रार करावी की, पालिका प्रशासनाकडून गोपनियतेचा भंग झाला आहे; अशी तक्रार करण्याचे धाडस त्यांनी दाखवावे. पत्रकारांनी गोपनियतेचा भंग कोणी केला, याबाबत ते काहीही बोलू शकलेले नाहीत, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. 1 फेब्रुवारी 2022 ला प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होणार होता. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही खासदार, महापौर, विधान परिषदेचे आमदार रवी फाटक यांच्यासह काही नगरसेवक यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. तेथे ते कशासाठी गेले होते. म्हणजे तुम्ही दबाव टाकायला गेले होते का? की त्यांनी तयार केलेला आधीचा आराखडा तसाच ठेवण्यासाठी ते गेले होते का? त्यांचे तिथे जाण्यामागे काय नियोजन होते,माझे खुले आव्हान आहे की तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासावे आणि कशासाठी गेले होते, हे जाहीर करावे. आमच्या मनात शंका होती की प्रशासन काही तरी काळेबेरे करीत आहे, म्हणून आव्हाड यांनी केवळ एक पत्र निवडणूक आयोगाला दिले. पण, हे आदल्या दिवशी शिवसेनेचे शिष्टमंडळ का गेले होते, निवडणूक आयोागवर दबाव टाकण्यासाठी पालकमंत्री गेले होते का, याचे उत्तर नरेश म्हस्के यांनी द्यावे; अन् त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी पोलीस तक्रार करावी अन् पालकमंत्र्यांनीही आपण आदल्या दिवशी शिष्टमंडळासह निवडणूक आयोगावर दबाव टाकायला गेला होतात का, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान परांजपे यांनी दिले.
राष्ट्रीवादीने कधीच दबाव टाकला नाही. शिवसेनेचे शिष्टमंडळच निवडणूक आयोगाकडे दबाव टाकण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकत घ्यावी; पण, ते न्यायालयात जाण्याबाबत म्हणत आहेत; त्यांनी न्यायालयात जावे, असेही परांजपे म्हणाले.