ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाढती मागणी लक्षात घेता प्रवाशांच्या सोईसाठी प्रदुषणविरहीत इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करुन देणेबाबतची मागणी पालकमंत्री आणि महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडे महापौरांनी केली आहे.
ठाण्यात १९८६ मध्ये परिवहन उपक्रम सुरू करण्यात आला. आज मितीस अंदाजे 95 मार्गावर परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना किफायतशीर सेवा देण्यात येत आहे. परंतु मागील काही काळात ठाणे शहराबरोबरच मुंब्रा, दिवा भागातही नागरिकरण झपाट्याने झाले असून परिवहन बसेसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला परिवहनच्या ताफ्यात 300 बसेस कार्यरत आहेत. परंतु लोकसंख्येच्या मानाने ही बससंख्या अपुरी पडत आहे. ठाणे शहरातंर्गत् प्रवास करणाऱ्या चाकरमानी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे परिवहन बसेसची मागणी वाढत आहे. सध्या अनेक कारणामुळे सर्वत्र प्रदुषणाचा स्तर वाढत आहे. यासाठी प्रदुषण विरहीत बसेस चालविण्याचा ठाणे महापालिकेचा मानस आहे. या दृष्टीने एम.एम.आर.डी.ए.च्या विकास निधीमधून किमान 100 इलेक्ट्र्रीक बस उपलब्ध करुन मिळाल्यास ठाणेकर नागरिकांना अधिक सक्षमतेने बससेवा उपलब्ध करुन देता येईल. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांना साकडे घातले आहे. आज परिवहनच्या माध्यमातून ठाण्यासह मुलुंड स्थानक, बोरिवली, मिरारोड, नारपोली तसेचनव्याने माजीवडा गोल्डन नाका ते कल्याण फाटा या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. परिवहनच्या ताफ्यात नव्याने बसेस उपलब्ध झाल्यावर ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रालगत असलेल्या इतर शहरामंध्येही बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देखील महापौर यांनी यावेळी दिली.