नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडे निधी नसेल तर पालिका प्रशासनाने दिवाळखोरी जाहीर करुन नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम नसल्याचे फलक लावावेत अन्यथा असे फलक आपणच लावू अशी टीका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली. शहरातील अनेक वस्त्यांमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या संदर्भात पठाण यांनी सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली. पालिका हद्दीतील अनेक शौचालयांची अवस्था आत्यंत वाईट असून पाणी-वीज अशा मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. पालिकेकडे निधी नाही असे कारण सांगून नागरी सुविधांच्या बाबतीतही हयगय केली जात आहे. ही हयगय आता खपवून घेतली जाणार नाही. नागरी सुविधा पुरवण्यासाठीही निधी नसेल तर आयुक्तांनी दिवाळखोरी जाहीर करुन पालिका मुख्यालयाबाहेर “आपण नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम नाही” असे फलक लावावेत; अन्यथा आपण असे फलक लावू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी शौचालयांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आधी मंजूर केलेला 10 कोटींचा निधी प्रभाग निहाग वाटून त्याच्या निविदा काढाव्यात असे आदेश दिले.