ठाणे शहरातील नागरीकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागात दर रविवारी जन की बात, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या रविवारी कोपरीमध्ये या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा होती. त्यातच बहुतांश कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कोविड उपाययोजनांच्या कामासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांच्या काळात जनसामान्यांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून पोकळ आश्वासने, होणारी टोलवाटोलवी, महापालिकेतील भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मालिकेमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात प्रत्येक भागातील नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जन की बात, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण शहराच्या विविध भागात दर रविवारी हा कार्यक्रम होईल. या उपक्रमाचा दुसरा कार्यक्रम ४ जुलै रोजी कळवा येथे होणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक प्रश्नांबरोबरच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे, टपाल विभागातील समस्यांविषयी नागरिकांना दाद मागता येणार आहे.