जिल्हयातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या क्षेत्रात ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन पुर्ववत स्वरुपात चालू ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी, तातडीच्या वैद्यकीय सेवा आणि शासकीय कामकाजाव्यतिरिक्त सर्व बाबींवर प्रतिबंध लागू राहतील. कंटेनमेंटच्या बाहेरील क्षेत्रासाठी राज्य शासनाचे मिशन बिगिन अगेननुसार वाढीव सवलती लागू राहतील. याबाबतची काटेकोर अंमलबजावणी संबंधित नगरपरिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी करायची आहे. शहापूर आणि मुरबाड नगर पंचायत आणि ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिका-यांनी कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या विचारात घेऊन घोषित केलेल्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक बाबी वगळता लॉकडाऊनचे प्रतिबंध पूर्ववत लागू राहतील असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे.