ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांना पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाल्यामुळे आता पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. शहराप्रमाणेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवीमधून पाणी पुरवठा होतो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून या धरणात सध्या ८२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८७ टक्के पाणी साठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ६२ मीटर पावसाची नोंद झाली आहे. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून या धरणात सध्या २६३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ७७ टक्के पाणी साठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या २४ तासात ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर चांगला राहिल्यास पाणी कपातीची टांगती तलवार पूर्णत: दूर होईल असं दिसत आहे.