धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणातील पाण्याच्या साठ्याची परिस्थिती सुधारली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. गेल्या आठवड्यात मात्र शहरात पाऊस पडत असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्यामुळं धरणातील पाणी साठा कमी झाला होता. त्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार होती. मात्र त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही ९४२ दशलक्ष घनमीटर आहे. आजघडीला या धरणामध्ये ६५५ दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणात ७० टक्के पाणी साठा आहे. गेल्या आठवड्यात हाच पाणी साठा ३६६ दशलक्ष घनमीटर होता. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आत्तापर्यंत १५३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच घडीला धरणामध्ये ५० टक्के पाणी साठा होता. त्यामुळं आता पाण्याची परिस्थिती चांगली असल्याचं दिसत आहे. बारवी धरणाची ऊंची वाढवल्यानंतर पाणी साठवण्याची क्षमता ही ३३८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या २३३ दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणामध्ये ६९ टक्के पाणी साठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आत्तापर्यंत १४६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या घडीला १५६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता. म्हणजे धरणामध्ये ८७ टक्के पाणी साठा होता. त्या तुलनेत यावर्षी धरणामध्ये टक्केवारीत पाण्याचा साठा कमी दिसत असला तरी प्रत्यक्षात धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत १०० दशलक्ष घनमीटर अधिक पाणीसाठा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading