ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारी धरणं आता भरली असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाल्यामुळे आणि धरणांमध्ये ५० टक्क्यांहूनही कमी साठा असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली होती. पाणी कपातीलाही सुरूवात करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसात पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळं धरणं आता काठोकाठ भरली आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवीमधून पाणी पुरवठा होतो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये ९०६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९६ टक्के पाणी पुरवठा आहे. गेल्यावर्षी याच काळात ९८ टक्के पाणी पुरवठा होता. बारवी धरणाचीही तीच परिस्थिती असून बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये २७० दशलक्ष घनमीटर म्हणजे ९२ टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा पाणी साठा ६९ टक्के होता. एकूणच धरणं काठोकाठ भरल्यामुळे आता पाणी टंचाईची चिंता आता दूर झाली आहे.